Showing posts with label Read Bharat. Show all posts
Showing posts with label Read Bharat. Show all posts

Saturday, 16 December 2023

पुस्तक: देवाच्या शोधात माझा प्रवास लेखिका: गौरी अनिल इंदुलकर

देवाच्या शोधात

हे पुस्तक ईश्वराच्या अस्तित्वाचे लेखिकेला आलेले पुन्हा पुन्हा प्रत्यंतर होय! श्रध्देचा आणि वाचनाचा परिणाम म्हणून लेखिकेला जे दिव्य अनुभव आले,त्या अनुभूतीची ,त्या दैवी सहवासाची आणि कृपेची शब्दात केलेली मांडणी म्हणजे हे पुस्तक!

पुस्तक: देवाच्या शोधात माझा प्रवास
लेखिका:  गौरी अनिल इंदुलकर
प्रकार:  अध्यात्मिक आत्मकथन
पृष्ठ: २२६
मूल्य: ३००

विज्ञानवादी किंवा तर्काने समजून घेणाऱ्या  विश्लेषकाला या पुस्तकातील सर्व घटना योगायोग किंवा सामान्य घटना वाटू शकतील. काहींना अंधविश्वास ही वाटेल...पण श्रध्देने जर विचार केला तर यातील प्रत्येक प्रसंग आपल्याही आयुष्यात येऊ शकतो,आपल्यालाही अनुभूती होऊ शकते...अगदी ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा वाचताना देखील!

अमेरिका सारख्या अतिशय सधन देशात रियल इस्टेट सारख्या व्यवसायात अमाप पैसा आणि संपत्ती मिळवलेल्या लेखिकेला वाचनाची प्रचंड आवड! त्यातही अध्यात्मिक पुस्तकांची ओढ अधिक!
ज्ञानेश्वरी चे वाचन करतां करतां लेखिका कुंडलिनी संदर्भात वाचते आणि त्याचा अभ्यास करायला लागते.योगी कथामृत वाचून साधना सुरू करते.श्री गाजाजन विजय ग्रंथ सहज झोपाळ्यावर बसून वाचताना असा काही दिव्य अनुभव येतो,की असे ग्रंथ वाचताना काही नियम असावेत असं वाटतं आणि अनुभवी साधकांशी संवाद सुरू होतो....त्यातून अनेक असे प्रसंग घडतात...जे कल्पनेत ही येऊ शकतं नाहीत.

प्रत्येक प्रकरण वाचताना सजह आणि सोपे वाटतं...पण वाचन झाल्यानंतर मात्र आपल्याला त्या मागची मोठी भूमिका समजते.त्याचा परिणाम होऊ लागतो.आपल्याला माहीत असलेल्या किंबहुना अनेक वेळा वाचलेल्या पुस्तकांचे,ग्रंथांचे मोल समजून येते...जसे तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्वरी!

प्रस्तुत पुस्तकाच्या मुखपृष्ठावर त्रिशूळ आहे. त्या त्रिशुलाचे लेखिकेला प्रकाशमान असे दिव्य दर्शन झालेलं आहे...
या पुस्तकाच्या बाबत लेखक आणि इतिहासकार असलेले संदीप भानुदास तापकीर  लिहितात,"अध्यात्मासारख्या एका दैवी व रहस्यमय विषयाशी ओळख झाल्यानंतर जिज्ञासा कशी वाढते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गौरी अनिल  इंदुलकरांचे "देवाच्या शोधात" हे पुस्तक! दहा वर्षे मेडिटेशन केल्यानंतर त्यांची चेन्नईच्या भगवती स्वामींची भेट झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. वीस वर्षे देवी साधना केलेल्या लेखिकेला या काळात आलेल्या रहस्यमयी, दिव्य व मती कुंठीत करणाऱ्या अनुभवांची आत्मकथा वाचताना आपण भारावून जातो. विशेष म्हणजे मुखपृष्ठावरील त्रिशूल व कुंडलिनी शक्ती यांचे प्रत्यक्ष जिवंत दिव्य दर्शन लेखिकेला झाले आहे."

"आपल्याला आलेल्या अनुभवांची इतर साधकांना माहिती मिळवून प्रोत्साहन मिळावे, हा लेखिकेचा उद्देश निश्चित सफल झाला आहे. देवी अनुभवाचे नाते आपल्या कुटुंबाशी, समाजाशी, धर्माशी व राष्ट्राची नक्कीच आहे, हे या पुस्तकात वाचायला मिळते.मोठमोठे धार्मिक ग्रंथ वाचायला आजकाल कोणालाच वेळ नाही. विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक तसेच अध्यात्माच्या मार्गावर असणाऱ्या सर्वांनाच हे पुस्तक यशस्वी होण्यासाठी ही गुरुकिल्ली आहे."


पुस्तक : सप्त सरितांचा प्रदेश लेखक संजीव संन्याल

पुस्तक : सप्त सरितांचा प्रदेश

लेखक: संजीव संन्याल

मराठी अनुवाद: संजीव जोशी

प्रकाशन: भारतीय  विचार साधना

पृष्ठ:३२६मूल्य:४००/


कृष्ण काळा का? बालाजी किंवा विठ्ठल ही काळे कसे?द्रौपदी ही काळी होती म्हणे!काळे असणे हेच कधीकाळी भारतात सुंदरतेचे लक्षण मानले जायचे! आहे ना मजेशीर!

 पृथ्वीवरील खंड जेंव्हा दूर दूर जाऊ लागले त्यावेळी भारतीय उपमहाद्वीप कसे कसे वर रेटत गेले आणि भूगोल कसा कसा बदलत गेला असा थोडासा जड विषय घेऊन सुरू झालेले हे पुस्तक पहिल्या प्रकरणात तर बोजड वाटू लागते..कारण त्यात अजुन  भारतीय माणूस आलेला नसतो... आणि जसे जसे आपण पुढे जाऊ तसे तसे लेखक पुरावा देत देत आपल्याला झटके देत जातो.

लेखक अतिशय चलाख आणि साळसूद म्हणावा तसे स्वतःवर काहीही घेत नाही.कोणताही दावा करत नाही..पण मांडणी मात्र भयंकर करतो ती ही पुराव्यानिशी! निर्णय मात्र वाचकांवर सोडून मोकळा होतो.

अर्ली इंडियन्स हे मूळ भारतीय हे एका लुप्त नदीकाठी विकसित झाले. ऋग्वेदात त्या नदीचा शकडो वेळा उल्लेख केला आहे ती सरस्वती! हिमालयातून उगम होऊन ती भारताच्या पश्चिमेला सिंधू सागरास (आरबी समुद्र)  मिळणारी नदी एकेकाळी सर्वात शक्तिशाली होती.सतलज आणि यमुना तिच्या उपनद्या! भूगोलाचे परिवर्तन होऊन यमुनेच्या प्रवाहाने दिशा बदलली...त्यापुढे जाऊन सतलज ही सरकली आणि सिंधू ला भेटली.दरम्यान प्रलयंकारी पुर ही आले...पण मूळ नदी ही पावसाळी नदी झाली.काही महिने वाहू लागली.ती सर्वात अलीकडे २०१० ला पुन्हा प्रवाहित झाली...ती लुप्त नदी म्हणजे त्या काळची सरस्वती आणि अलीकडे घग्गर होय! ही गोष्ट दुसरें प्रकरण वाचताना आपोआप स्पष्ट होत जाते...

हे वाचून पुस्तकाचा विषय काय आहे असा  प्रश्न पडू शकतो.पुस्तकाचा मुख्य विषय आहे भारतातील बदलती नगर रचना! बनते बिघडते  म्हणावे तसे कसे कसे नगर विकसित होत गेले  असा विषय मांडत मांडत फटके मारत मारत लेखक पुढे सरकत जातो. हडप्पा पासून सुरु होऊन अलीकडच्या गुडगाव पर्यंत अनेक महानगरांच्या कथा आणि वर्णन वाचताना मनात अभिमानाचे कंप सुटतात...हे वाचताना कधी फियान(फा - हियान चिनी प्रवासी) येतो तर कधी रोमन लेखक प्लीनी येतो (प्राचीन रोमन अर्थतज्ञ). अनेक माहित नसलेले प्राचीन लेखक आणि त्यांचे साहित्य आपल्याला माहिती होते.इंडिका लिहिणारा मेगॅस्थेनीस(मॅसेडोनियन वकील: पाटलीपुत्र चे वर्णन - लाकडी फळ्यांचा उपयोग केलेलं शहराभवती कुंपण , खंदक, ६४ प्रवेशद्वार, साडेचौदा किमी लांब अडीच किमी रूंद शहर.) अधून मधून दिसतो....कौटिल्याच्या अर्थशास्त्रात तर वाहतुकीचे नियम ही लिहिले गेले आहेत.रस्त्यावर गाडी उधळली तर त्याने दंड लावण्याची सूचना त्याच काळात केली होती..अपवाद फक्त बैल पागल झाला असेल किंवा कासरा( बैलाची दोरी) तुटली असेल!

हे वाचून तुम्ही म्हणाल यात काय प्रक्षोभक? आहे ते तर आहेच! उदाहरण पाहू! नंद राजाचे राज्य जिंकून चंद्रगुप्त मौर्य चक्रवर्ती सम्राट होतो.चाणक्याच्या मदतीने भारतातील सर्वात मोठे साम्राज्य निर्माण करतो....ते साम्राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य जे की मगध प्रदेशात! हा मगध प्रदेश चक्क महाभारत काळापासून प्रचंड  शक्तिशाली आहे. महाभारत काळातील जरासंध असो की गुप्तकाळात  राजा बिंबिसार सर्व शक्तिशाली! कारण या प्रदेशाची सुपीकता आणि तेथील लोह!

 आजोबा सम्राट चंद्रगुप्त याने निर्माण केलेले राज्य नातू सम्राट अशोकाच्या(उत्तरकाळात) अंमलाखाली खिळखिळे झाले.आपण सम्राट अशोकाने राज्य त्याग केला असे वाचतो पण लेखक लिहितो,
"अशोकाने इ.पू.२३२ मध्ये वयाच्या ७२ व्या वर्षी मृत्यू येईपर्यंत राज्य केले.....शेवटी शारीरिक दौर्बल्यामुळे कार्यक्षमता कमी होऊन सुद्धा त्याने सत्ता पदाचा त्याग केला नाही.साम्राज्याची स्थापना करणारे त्याचे आजोबा व चाणक्य यांच्या अगदी विरुद्ध त्याचे वर्तन होते. जराजर्जर राज्यकर्त्यांच्या प्रश्‍नाने भारताचा अनेक शतके पिच्छा पुरवला आहे."

याच  पुस्तकात कधीही ज्याचा उल्लेख टाळला जातो त्या वात्सायन ने लिहिलेल्या कामसूत्र ग्रंथाचा हवाला देऊन त्या काळची सामाजिक स्थिती सांगितली आहे. गुलछबु लोकांचे जीवन सुखी व्हावे म्हणून त्यात त्या काळी काही सामाजिक टिप्स सुद्धा होत्या.गमंत नाही हो , त्याच ग्रंथात  सुखी चैनीत जीवन जगण्यासाठी शहरात राहण्याचा सल्ला दिलेला आहे. वाढत्या नागरीकणामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला तर नवल नाही.

 धार्मिक वाद हे केवळ विद्वानांपुरते मर्यादित होते असे लेखक लिहितो.सामान्य जनता सर्व उत्सव एकत्र पार पाडत असे.एकत्र राहत असे...
वैदिक गुरू चाणक्य यांचे शिष्य चंद्रगुप्त मौर्य हे आयुष्याच्या शेवटच्या काळात जैन धर्म स्वीकारून वानप्रस्थ झाले.कर्नाटकात ज्या टेकडीवर त्यांनी उर्वरित आयुष्य काढले ती टेकडी आजही चंद्रगिरी नावाने प्रसिद्ध आहे. तर सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे नातू सम्राट अशोक महात्मा बुद्धांचे अनुयायी झाले होते.त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार केला.

 गुप्त काळातील पाटलीपुत्र मधील रथ यात्रेसंदर्भात   फा - हीयान   लिहितो," चार चाकी गाड्या तयार केल्या होत्या.त्यावर पाच मजली इमारत असावी इतके उंच मनोरे केले होते. (लोकांनी त्याला सजवले होते.) लोकांनी पूज्य देवतांच्या मूर्ती गाड्यांच्या मध्यभागी व बुद्धाच्या मूर्ती चारी कोपऱ्यात ठेवल्या होत्या....लोक हे रथ ओढत असत. राजघरान्यापासून अगदी गरिबांपर्यंत सर्व भक्तजन या समारंभात भाग घेत.याचाच अर्थ त्याकाळी धार्मिक भेद हे केवळ विद्वान लोकांच्या विद्वत चर्चेमध्ये असतील!

या पुस्तकात नगरांची माहिती घेता घेता अनेक अज्ञात  मजेशीर गोष्टी वाचायला मिळतात.जसे की श्रीलंकेत लोक स्वतःला सिंह समजून घेतात.त्यांची भाषा सिंहली! पण श्रीलंकेत एकही सिंह नाही! त्यापुढे त्यांचे विरोधक मात्र स्वतःला वाघ(तामिळ वाघ) मानतात.पण ते ज्या भारतातून गेले आहेत त्या भारतात वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी आहेत.हा एकच देश आहे जेथे वाघ आणि सिंह आहेत....पण सिंह प्राण्याचा वेदांमध्ये फारसा उल्लेख नाही. पण भारतीयांना सिंहाचे फार आकर्षण आहे.म्हणून अनेकांच्या शेवटी सिंह किंवा सिंघ लावले जाते.सिंह हा राजा! वाघासारखा जंगलात लपून नाहीं राहत.तो उघड्यावर राहतो.कुटुंबात राहतो...त्यामुळे भारतात राज्याच्या राजगादी ला सिंहासन असेही म्हटले जाते! मग हा सिंह वेदांमध्ये का नाही? कारण त्याकाळात त्या भागात जंगल आणि पाणी मुबलक होते.सिंह यापासून दूर राहतो.

पुस्तकाचा अवका इतका मोठा आहे की त्याचा परिचय देखील तसाच मोठा होत गेला आहे...
असो....

जेरुसलेम मधून भारतात ज्यू आले त्यांचे भारतीयांनी स्वागत केले.पण पोर्तुगिजांनी भारतात त्यांना बळजबरीने धर्मांतरित केले... तसेच एक माहिती अशी ही वाचायला मिळते की क्लिओपात्रा भारताकडे निघाली होती...पण रस्त्यात तिची हत्या झाली.

 भारताविषयी आकस - आकर्षण असलेले देशी - विदेशी  विद्वान भारतीयांच्या उगमाचे सिद्धांत सांगत आले. अनेक वाद निर्माण केले गेले.काही झाले.सिंधू संस्कृती ही वैदिक संस्कृती नव्हती! आर्य - अनार्य! आर्य आणि द्रविड असे हे वाद! पण लेखकाने अतिशय अनोख्या शैलीत या सगळ्यांना कमजोर ठरवले आहे....म्हणून हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे. त्यातील तथ्य शिधावेत. खरं की खोटं स्वतः ठरवावं.

डाव्या वळणाच्या अर्ली इंडियन्स पेक्षा हे पुस्तकं नक्की वाचायला उजवे आहे हे पक्के!कारण हे पुस्तक वाद वाढवत नाही तर एकोपा कसा होता हे सांगते.उत्तर दक्षिण वेगळे नाहीत हे सिद्ध करते. ऋग्वेदातील त्या प्रसिद्ध युद्धाचे ही वर्णन लेखक करतो ज्यात दहा जमतींच्या युती विरुद्ध भारतीय एक जमात लढली.

 लेखक संजीव संन्याल हे निश्चितच इतिहासकार किंवा त्या विषयातील पदवीधर नाहीत..ते आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे अर्थतज्ञ! पण त्यांनी एक नव्हे दोन नव्हे चक्क आडीच वर्षे या विषयासाठी सुट्टी घेऊन अभ्यास आणि प्रवास करून हा लेखन प्रपंच केला.शेवटी या पुस्तकाची मूळ इंग्रजी प्रत पेंग्विन प्रकाशनाने हिसकावून घेऊन मुद्रित केली...कारण लेखक या विषयात आणखी अभ्यास करू इच्छित होते.जगभर लाभलेला प्रचंड प्रतिसाद हा पुस्तकाला नव्हे तर भारतीय संस्कृती व इतिहासाला लाभला असा नम्र भाव लेखकाने व्यक्त केलेला आहे.

एकात्म एकसंघ देश एका बाजूला आणि जात, प्रांत,भाषा, वंश यातून वाद निर्माण करणारे दुसऱ्या बाजूला....ही स्थिती आज देशात आहे....मान्य करणे वा नाकारणे हे आपल्यावर आहे.


वाचन संस्कृती अबाधित राहण्यासाठी

वाचन संस्कृती अबाधित राहण्यासाठी वाचनाचे महत्व 
      

 ‘वाचाल, तर वाचाल’ या म्हणीचा अर्थ आणि त्या अर्थाचे अन्वयार्थ किती समर्पक आहेत हे आजच्या घडीला समजत आहे. ‘ग्रंथ हेच गुरू’ असे म्हटले जाते. अर्थात माणसाच्या आयुष्यात एक ग्रंथ हा आमूलाग्र बदल करू शकतो. गुरू जसा आयुष्यात मार्गदर्शन करत असतो, त्याचप्रणाणे ग्रंथ वाचनाने आपल्या आयुष्याला विविध वळणे मिळत असतात. आज वाचन कमी होत आहे, असे प्रकर्षाने जाणवत आहे.

 तरुणाईचा वाचनाकडे कल कमी असल्याने वाचन संस्कृती हळूहळू लोप पावत आहे, असे म्हटले तरी ते वावगे ठरू नये.


तासन्तास ऑनलाईन चॅट करत राहणारी आजची तरुणाई सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे. माणसाची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्याचे ज्ञान आणि हे ज्ञान संपादन करण्यासाठी वाचण्याशिवाय पर्याय नाही. या स्पर्धेच्या अहमहमिका युगात कोणत्याही क्षेत्रात टिकायचे असेल, तर त्या क्षेत्रातील ज्ञान असणे अनिवार्य आहे, तर आणि तरच तुम्ही त्या क्षेत्रात टिकाव देऊ शकता. ‘नॉलेज ईज पॉवर’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. ‘वाचाल, तर वाचाल’ म्हणजे तुम्ही जर वाचाल तरच स्पर्धेच्या युगात वावरू शकाल. वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल आणि पयार्याने त्याचा उत्तम युवापिढी घडण्यासाठी उपयोग होईल. माणूस ज्ञानाच्या या शक्तीच्या सहाय्याने त्याच्या सदसद्विवेकबुद्धीत भर पडते तसेच प्रगल्भ होतो आणि महत्त्वाचे म्हणजे त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो.

 पूर्वीच्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन कमी आहे, अशी तक्रार सर्वच थरातून होत आहे. याला स्वाभाविकपणे कारण ते म्हणजे मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडिया आणि त्याच्या सभोवती असणारे वातावरण, कुटुंबात जर वाचन केले जात असेल, तर मुलांना वाचनाची गोडी निर्माण होईल. परंतु याउलट घरात वातावरण असेल, तर मुलांमध्ये वाचनाची आवड कशी निर्माण होईल? यासाठी मुख्यत: पालकांनी वाचनाची गोडी मुलांमध्ये निर्माण केली पाहिजे. आपण अनेकवेळा ऐकले असेल की, पूर्वीच्या लोकांना सकाळी चहाबरोबर पेपर वाचण्यासाठी लागत असे. पेपर वाचल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नसे; परंतु आता काळानुरूप परिस्थिती बदलली आहे. पूर्वी पेपरमधून बातम्या वाचल्यामुळे वाचनाची आवड निर्माण होत असे. परिणामी ‘वाचनाचे वेड’ यामुळे वाचन रोज होत असे, कालांतराने त्याच पेपरमधील बातम्या आपण रोडिओवर ऐकू लागलो. पुढे टीव्हीचा उदय झाल्याने त्याच बातम्या टीव्हीवर पाहू लागलो आणि आता सोशल मीडियामुळे बातम्या ऑनलाईन पाहू लागलो. विज्ञानाने प्रगती केल्यामुळे आपण फॉरवर्ड झालो असलो तरी, वाचनातून आनंद घेण्याचे आपण हरवून बसलो. वाचनातून जो आनंद मिळतो तो आनंद विरळाच असतो.

वाचनामुळे अनेक व्यक्तींच्या जीवनाचे सोने झाले. अगदी लहानपणी केळुसकर गुरुजींनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘बुद्ध चरित्र’ हे पुस्तक भेट म्हणून दिले होते. या पुस्तकाचा परिणाम एवढा झाला की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या घटनेचे शिल्पकार झाले, तर ‘राईटस ऑफ मॅन’ हे थॉमस पेन यांचे पुस्तक वाचून महात्मा फुले यांना प्रेरणा मिळाली, त्यामुळे महात्मा फुले थोर समाजसेवक झाले. हे सर्व फक्त आणि फक्त वाचनामुळे शक्य झाले. अशी अनेक उदाहरणे आहेत.
 वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी आणि प्रत्येक माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी वाचनाची आवड लहानपणापासूनच निर्माण होणे आवश्यक आहे. तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करायची असेल, तर तशी परिस्थिती त्यांच्याभोवती निर्माण करणे गरजेचं आहे, जेवढे वाचन कराल तेवढे ज्ञान वाढत जाईल. ‘ग्रंथ हे गुरू’ आहेत आणि ग्रंथ वाचनाने दिशा ठरत असते, एक पुस्तक हे एका मित्रासारखे असते. मित्रांचा जसा आपल्यावर प्रभाव असतो, त्याचप्रमाणे एक पुस्तक आपल्यावर विविध पैलू पाडण्यास कारणीभूत ठरते. पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारते आणि असे मस्तक सहजासहजी कोणाही पुढे नतमस्तक होत नसते, असे म्हटले जाते. वाचनाची सवय एकदा लागली की, माणूस मनावरचा ताण कमी करण्यासाठी पुस्तकांच्या सहवासात गुंगून जातो. पुस्तकांमुळे कमकुवत मनाला धीर मिळतो. त्यामुळे निराशेच्या गत्रेत अडकलेला माणूस आत्महत्या, हत्या असे प्रकार करण्यापासून परावृत्त होतो. मात्र आज वाचनासाठी अनेक उत्तम साधने उपलब्ध असूनही, तरुण पिढी वाचनापासून दूर जात आहे. अधिक अधिक इंटरनेटवर वेळ घालवत असल्याचे आजचे चित्र आहे. नव्या माध्यमांच्या आगमनाने वाचन संस्कृती लोप पावत आहे. तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी विविध उपक्रमांद्वारे जनजागृती निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अनेक महान व्यक्तींनी ‘तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल, तर वाचन करा’ असा संदेश दिला आहे. सखोल विचारातूनच एकरूप समाज निर्मित होत असते आणि सखोल विचार करण्याची सवय चांगल्या वाचनातूनच तयार होते.

 वाचन म्हणजे जीवनाला उन्नत करणारी बाब असून यामुळे बुद्धीची मशागत होते. माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्त्वाचा वाटा असतो. त्याचप्रमाणे जगण्याच्या परिपूर्णतेसाठी वाचन हे आवश्यक आहे. ज्ञानात सतत वाढ करण्यासाठी वाचन हा एकमेव मार्ग आहे. आज वाचनालयांची जागा इंटरनेट आणि ई-बुकने घेतली आहे. विद्यार्थ्यांनी उन्हाळी सुट्टीत खेळण्याबरोबर विविध विषयांचे अवांतर वाचन केले पाहिजे. कारण अवांतर वाचनामुळे मतपरिवर्तन होऊ शकते.

पुस्तकांमधील समृद्ध विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. वाचनाने आपली शब्दसंपदा वाढते, अनुभवांसह कल्पना, आशा-आकांक्षा जागृत होतात, वाचनामुळे रसिकता वाढीस लागते, सृजनशीलतेत भर पडते, सहृदयता, दुस-याच्या दु:खाची जाणीव, ती समजून घेण्यासाठी आवश्यक असणारे संवेदनशील मन यांस खतपाणी मिळते. इतरांबाबत, समाजाबाबत, आपली काही कर्तव्ये आहेत याचे भान प्राप्त होते. मन संकुचित, क्षुद्र गोष्टीत अडकत नाही. वाचनामुळे मेंदूला चालना मिळते, नवीन शब्दांमुळे त्याच्यात प्रगती होते, वाचनामुळे नवनवीन माहिती मिळतेच तसेच ज्ञानात भर पडते. वाचनामुळे आपल्याला इतरांचे ऐकायची सवय लागते. ऐकण्यासाठी संयम असायला हवा. वाचनामुळे आपण आपोआप संयम राखायला शिकतो. सामान्य ज्ञान वाढते, वाचनामुळे आपण मित्रमंडळी किंवा लोकांमध्ये वावरताना एखाद्या विषयावरील चर्चेत आपले मुद्दे योग्य प्रकारे मांडू शकतो. वाचनामुळे अनेक फायदे आपण घेऊ शकतो. मानसिक उत्तेजना मिळण्यास मदत होते, मनावरचा ताण कमी होतो, एकाग्रता वाढल्यामुळे एखादे ध्येय गाठण्यास मनाची एकाग्रता कामी येते. माजी राष्ट्रपती स्वर्गीय ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करत आपण वाचन संस्कृतीची जनजागृती करत आहोत. पुस्तकांविषयी ही कायमची ओढ तरुणांच्याही मनात निर्माण होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. 
पालकांनी किंबहुना कुटुंबातील प्रत्येक सदस्यांने घरात वाचनाची वातवरण निर्मिती केली पाहिजे, जेणेकरून मुलांमध्ये लहानपणापासून वाचनाची आवड आणि गोडी निर्माण होईल. तेव्हाच ख-या अर्थाने वाचन संस्कृती वाढण्यास मदत होईल.

Saturday, 29 April 2023

स्मृतिचित्रे /लेखक -लक्ष्मीबाई टिळक


               स्मृतिचित्रे.                  


लेखन: लक्ष्मीबाई टिळक
पहिली आवृत्ती:१९३४
सातवी आवृत्ती: २०१८(त्याचेच लेटेस्ट पुनर्मुद्रण)
पृष्ठ:४५८ मूल्य:४००/

मराठी सारस्वतात अमर राहणारी जी काही थोडी पुस्तके आहेत त्यात 'स्मृतिचित्रे' चा समावेश होतो. आत्मचरित्रात तर इतके पारदर्शी, भावपूर्ण व हृदयम आत्मचरित्र दुसरे नाहीच. 
प्रसिद्ध समिक्षक माधव मनोहर म्हणतात की ' हा ज्ञानेश्वरीजवळ ठेवावा असा ग्रंथ आहे.' 
स्मृतिचित्रे हे केवळ आत्मचरित्र नाही, तर तो १८६० ते १९२० या कालखंडातील सामाजिक इतिहास आहे. 
या काळातील सामाजिक बदलांचेही चित्रण यात आढळेल. 
यातील भाषा ओघवती व अकृत्रिम आहे. त्यावर इंग्रजीचा छाप नाही. 
अगदी बाळबोध मराठी किती गोड असू शकते ते या पुस्तकातून कळेल. 
हे लिखाण हृदयातून उत्स्फूर्तपणे बाहेर आलेले आहे, यामुळे त्यात ताजेपणा व जिवंतपणा आहे. लक्ष्मीबाईंचे जीवन एक प्रकारे अद्भुतरम्य व तसे जगावेगळे आहे. या रम्यतेचे, अद्भुततेचे प्रत्ययकारी चित्रण त्यांच्या सोप्या व शैलीदार भाषेने वाचकांच्या डोळ्यासमोर चित्रपटाप्रमाणे उभे राहते. 
आत्मचरित्र म्हणजे आपले दोष लपवणे व दुसऱ्याचे दाखवणे असा प्रकार असतो. तो मात्र येथे मुळीच सापडणार नाही. 
दोषांचे दर्शन नाही व कसलीच लपवाछपवी येथे नाही, किंवा कोणावर आरोप केलेले नाहीत. कोणतेही प्रचलित शिक्षण न घेता केवळ कठीण परिस्थितीशी लढा देऊन मन किती सुसंस्कृत होऊ शकते याचे चित्र या पुस्तकात आढळते. आपल्या जीवनाकडे संपूर्ण निर्विकार मनाने पाहण्याची लक्ष्मीबाईंची दृष्टी या पुस्तकात आढळून येईल. 
इतकेच नव्हे तर अनासक्त बुद्धीने कर्तव्य करीत राहण्याची निष्ठा आणि काळोखातही सोनेरी किनार लावणारी असामान्य विनोदबुद्धी त्यांच्या ठिकाणी होती. 
यातील विनोद कोणालाच बोचणारा नाही. किंबहुना स्वत:वरच केलेला आहे. 
प्रसन्न व गोड विनोद कसा असतो ते या पुस्तकावरून समजेल.

Friday, 14 April 2023

आमच्या आयुष्यातील काही आठवणी - रमाबाई रानडे


आमच्या आयुष्यातील काही आठवणी - रमाबाई रानडे

सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातील या  तीन मराठी स्त्रिया ज्यांनी येथील सामाजिक स्थित्यंतर स्वतः पासून सुरू केलं..! 
आपल्या इच्छा शक्तीने,जिद्दीने समाज  आणि स्वतःच्या अप्त स्वकियांचा विरोध सहन करून त्या शिकल्या.ज्या काळात मुलींना शिक्षण हे पाप मानल गेलं

लेखिका: श्रीमती रमाबाई रानडे
पहिली आवृत्ती: १९१०
पाचवी आवृत्ती: २०१७(त्याचेच लेटेस्ट पुनर्मुद्रण)
पृष्ठ:२७२ मूल्य:३००/
या पुस्तकबाबत गोपाळ कृष्ण गोखले लिहितात,

"महाराष्ट्राचे मोठे भाग्य,हा ग्रंथ लिहिण्याचे श्री. वहिनीबाईंनी मनात आणले व हाती घेतलेले काम तडीसही नेले, हे महाराष्ट्राचे मोठे भाग्य समजले पाहिजे. पत्नीने आपल्या पतीबद्दल अशा तऱ्हेने लिहिलेला हा पहिलाच ग्रंथ हिंदुस्थानात आहे असे वाटते, व तो वहिनीबाईंनी लिहिला हे फार योग्य झाले. कारण, हल्लींच्या काळात आपल्या इकडील स्त्रियांत श्री. वहिनीबाईंची योग्यता फार मोठी आहे. आपल्या वयाची सत्तीवीस वर्षे ज्यांनी त्या विभूतीबरोबर त्यांची सहधर्मचारिणी या नात्याने 'सावली' प्रमाणे घालविली, ज्यांच्या अंगचे नैसर्गिक तेज शिक्षणाने व अतिथोर सहवासाने अनेक पटींनी वृद्धिंगत झाले, व ज्यांचे मन रावसाहेबांच्या भक्तींत कायमचे गढ़ून राहिले आहे, त्यांनी आपल्य दिगंतकीर्ती पतीच्या स्वभावाचे व आयुष्यक्रमाचे काढलेले चित्र आपणास पाहावयास मिळाल्याबद्दल महाराष्ट्रातील लोकांस अभिमान व समाधान वाटणे साहजिक आहे."

"स्त्रियांच्या मनोधर्माचे मोहक रूप:हे पुस्तक वाचणाराचे मनावर ज्या कित्येक गोष्टींचा विशेष ठसा उमटल्याशिवाय राहाणार नाही, त्यापैकी एकदोहोंचा येथे उल्लेख करणे जरूर वाटते. पाश्चिमात्य समाजात पुष्कळ कुटुंबांत पतिपत्नींमध्ये पराकाष्ठेचे प्रेम आढळते, पण त्यांचा परस्परभाव बहुतेक बरोबरीचा असतो; पण तशा तऱ्हेचेच प्रेम उभयतांमध्ये असता पत्नीने पतीच्या सेवेस आपणास सर्वस्वी वाहून घेऊन त्यातच धन्यता मानावी, हा पूर्वेकडील स्त्रियांचा व त्यातही हिंदुस्थानातील स्त्रियांचा विशेष मनोधर्म आहे.
हा मनोधर्म हजारो वर्षांच्या संस्कराचे व परंपरेचे फल आहे व त्याचे अत्यंत मोहक स्वरूप या पुस्तकात दिसून येत आहे. 
नवे शिक्षण, नव्या कल्पना व नवी परिस्थिती यांनी विचारास व आयुष्यक्रमास नवे वळण लागले असताही वहिनीबाईंसारख्या स्त्रियांचा हा मनोधर्म आहे तसाच कायम राहातो, यापासून पुष्कळ बोध घेता येण्यासारखा आहे."

Friday, 31 March 2023

डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र /लेखिका -काशीबाई कानिटकर


सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातील या  तीन मराठी स्त्रिया ज्यांनी येथील सामाजिक स्थित्यंतर स्वतः पासून सुरू केलं..! 
आपल्या इच्छा शक्तीने,जिद्दीने समाज  आणि स्वतःच्या अप्त स्वकियांचा विरोध सहन करून त्या शिकल्या.ज्या काळात मुलींना शिक्षण हे पाप मानल गेलं.

आपल्या नवऱ्याच्या भरभक्कम साथीने त्या घरातील आणि समाजातील निंदा नालस्ती ला पुरून उरल्या.स्वतःच्या कर्तुत्वाचा ठसा कायमचा उठवला


डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र
लेखिका:काशीबाई कानिटकर
दुसरी आवृत्ती:१९१२
चौथी आवृत्ती:२०१९(त्याचेच लेटेस्ट पुनर्मुद्रण)
पेज:३२८ मूल्य:३५०/

ज्या काळात भारतीय स्त्रीला शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं, त्या काळात एक  सतरा स्त्री एकटीच परदेशी जाऊन वैद्यकीय शिक्षण घेते ही क्रांतिकारकच म्हणावी अशी घटना होती. भारतातील पहिली महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशींचं नाव आज आपण अतीव आदराने घेतो.

या उच्चविद्याविभूषित स्त्रीचं चरित्र त्यांच्या मृत्यनंतर काशीबाई कानिटकर यांनी लिहिलं. पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर म्हणून त्यांचं चरित्र लिहिलं गेलं पाहिजे आणि ते तेवढ्याच तोलाच्या स्त्रीने लिहिलं पाहिजे, असं त्यांना वाटत होतं. या संदर्भात काशीबाई लिहितात, 
“सौ. डॉ. आनंदीबाईंचे चरित्र लिहिण्यास त्यांच्या तोलाचेच मनुष्य पाहिजे होते, व ही इच्छा माझ्या एका विद्वान मैत्रिणीजवळ मी एके प्रसंगी व्यक्त केली होती; परंतु कार्यबाहुल्यामुळे तिने नन्नाच्या पाढ्यासारखेच उत्तर दिले. झाले काम तर तेथेच होईल अशी माझी अशा होती, ती निष्फळ झाल्यासारखी मला वाटली. 
कारण त्या एका मैत्रिणीशिवाय पुस्तक लिहिण्यासारखी विद्वान स्त्री माझ्या ओळखीची व योग्य अशी दुसरी आढळण्यास नाही. 
तेव्हा मला असा विचार पडला की, आता कोणाला विचारावे! शेवटी काहीच जमेना, तेव्हा हे काम वेडेवाकडे आपणच करून टाकावे, असा मी निश्चय केला.” काशीताईंना जरी हे ‘वेडेवाकडे’ वाटत असले तरी या चरित्राची दाखल तत्कालीन विविध नियतकालिकांनी घेतलेली दिसते. 
काहींनी त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं असलं तरी काहींनी प्रखर टीकाही केली. मात्र या लेखनामुळेच आनंदीबाईंचं तपशीलवार चरित्र पुढील पिढ्यांना उपलब्ध होऊ शकलं, हे या पुस्तकाचं मोठं योगदान आहे. 
अवघ्या दहा दिवसांचं मूल उपचाराअभावी दगावलं तेव्हा त्या दुःखातून सावरताना आनंदीबाईंनी डॉक्टर होण्याचा निश्चय केला आणि वयाच्या सतराव्या वर्षी एकट्याने अमेरिकेला जाऊन आपलं वैद्यकीय शिक्षण घेतलं. 
अनेक आपत्तींना तोंड देत त्यांनी शिक्षण कसं पूर्ण केलं ते काशीबाईंनी आपल्या पुस्तकात अगदी मनःपूर्वक लिहिलं आहे.
याबरोबरच आनंदीबाईंच्या पती गोपाळराव यांचं चरित्रही त्यांनी रेखाटलं आहे.

Thursday, 30 March 2023

इकिगाई :जगायला उमेद देणारा एक जादूई कुंभ

इकिगाई :जगायला उमेद देणारा एक जादूई कुंभ

जगभर ज्या पुस्तकाची सातत्याने वाढती चर्चा आणि वाचन चालू असते ते म्हणजे इकिगाई!

तुम्हाला जेंव्हा केंव्हा थोडंसं ही बोर होऊ लागलं किंवा रिकामे वाटायला लागलं की हे पुस्तक काढावे आणि पुन्हा वाचावे!

शरीर मन आणि बुद्धी सतत ताजे तवाने ठेवू शकतो आपण!

आज आपण तरुण आहोत.हाताला काम आहे.नाती गोती मित्र मैत्रीण आहेत.वेळच नाही पुस्तकं वाचायला.ठीक आहे नका वाचू भरपूर पुस्तकं...पण हे पुस्तक नक्की वाचा.उत्तर आयुष्यातील एकाकीपणाची कल्पना करून वाचावे....अख्खे जीवन सुखी जाईल!

हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचायचे असल्याने हार्ड कव्हर असलेलेच विकत घ्यावे.भेट द्यावे.

हार्ड कव्हर पुस्तकाची किंमत:३९९/


प्रत्येक निवृत्त व्यक्तीस  कॉमन प्रश्न पडतात..?
•वेळ कसा  घालवायचा ?
•आपण वयस्कर झालोत का?
•आरोग्य साथ देईल का?
•घरात स्वतंत्र स्थान राहील का?

या सर्व प्रश्नापासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येकाने वाचावे "इकिगाई "

इकिगाई म्हणजे आवडती गोष्ट करण्याची स्फूर्ती व त्यापासून  मिळणारा आनंद ही व्याख्या बरोबर आहे.  इकिगाई हा मूळ शब्द जपानी.  मला मराठी पुस्तक वाचायला मिळाले हे माझे भाग्य आहे. इकिगाई या इंग्रजी पुस्तकाच्या उत्तम मराठी अनुवाद  करण्याचे आभार जातात ते प्रसाद ढापरे यांना,  की ज्यांनी हे उत्तम मराठी अनुवादित पुस्तक आम्हा मराठी रसिक वाचकांना उपलब्ध करून दिले.

"इकिगाई" मनाला चिरतरूण करते.
खरंखुरं आनंदी जीवन जगायला शिकवते. भरपूर अर्थार्जन केले की संपन्नता आली हा गोड गैरसमज आहे,  पण असे नाही, हे या पुस्तकातून शिकता आले.  अर्थार्जनाखेरीजही कला, कौशल्य,  वाचन,  स्वयंपाक,  गाणं,  भजन,  पर्यटन,  नातेवाईक भेटी, समाजकार्य, लेखन,  यासारखे अनेक छंद पूर्ण करायचे राहून गेलेले आहेत,  हे लक्षातच येत नाही.

खरे तर वय वर्षं 60 झाले,  मी थकले/थकलो हे म्हणणे अत्यंत भ्याडपणाचे लक्षण आहे, हे म्हणण्याचे धाडस येते हे पुस्तक वाचले की.  थकण्याचे हे वय नाहीच मुळी. उलट वयवर्षे 60 ते 70 हा काळ स्वतंत्र जगायचा. म्हणजे दिवसाच्या 24 तासांचे मालक तुम्हीच.  मुक्तछंदाचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा काळ.

बांधीलकी, जबाबदाऱ्यांतून मुक्त होतोय याचा अर्थ असा नव्हे की, येथून पुढची दैनंदिनी आराम आराम आणि आरामच करायला पाहिजे.  मंडळी, माहित आहे ना, पंडित चाचा नेहरू  म्हणायचे "आराम हराम है !"  तेच तर करायचेय आरामाला टाटा, बाय बाय करून छंद व आरोग्य जोपासण्यासाठी वेळ कामी लावायचा हे शिकवले "इकिगाई" नी.आणि उमगले प्रत्येकाचा इकिगाई कशात ना कशात दडलेला आहे.

सतत खाणे, पोटभर जेवणे व टीव्ही मोबाईलमध्ये  सतत कोणत्या ना कोणत्या स्क्रीनच्या आधीन होणे ही न सुटणारी व्यसने आहेत.    फेसबुक,  व्हॉटसअँपवर स्क्रोलिंग होत राहणार आहे,  त्याला अंत नाही.  ते एक खेळणं म्हणून मनुष्य वापरतोय आणि मनुष्य कळसूत्री बाहुला झालाय हे कुठेतरी थांबायला हवय हे मनापासून वाटत इकिगाई वाचनानंतर.

पुस्तके सावलीसारखी पाठीशी असतात,  हे मनावर बिंबलय लहानपणापासून. ते आज इकिगाईनी सिध्द केलय.

भूकेपेक्षा कमी म्हणजे 100 ऐवजी 80 टक्के जेवण घेणे,  दैनंदिन व्यायाम-योगा व सतत कार्यमग्नता  ही त्रिसूत्री देणगी साठीनंतरचे निरोगी जीवन जगण्यासाठी मिळालीय इकिगाईतून.  इकिगाईमुळे एक मनुष्य नाही तर पूर्ण कुटुंब व पर्यायाने आपलाा देशही दीर्घायुषी होईल व सर्वाधिक निरोगी ज्येष्ठ  लोकसंख्या असणारा देश म्हणून भारताची गणना होऊ शकेल.

आवडत्या माणसाच्या प्रेमात पडणे काय असते हे माहित होते,  पण आवडत्या पुस्तकाच्या प्रेमात पडणे काय असते याची अनुभूती मिळाली इकिगाईतून.  


येथील प्रत्येक जण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड काही ना काही कामात गुंतलेला असतो. बागकामापासून ते स्वयंपाक आणि इतर आवडीची कामे करण्यापासून ते वयाच्या ८८ व्या वर्षी driving करण्यापर्यंत. आहार पाहाल तर तो ही थक्क करणारा. आपल्याकडच्या सीनिअर सिटीझन ग्रुप्स मध्ये वय वर्षं ६० ते साधारण ९० पर्यंत वय असलेले नागरिक असतात. अगदीच कधीतरी ९५ च्या आसपास वय असलेले आजोबा किंवा आजी दिसतात. ओकिनावा मध्ये जो सीनिअर सिटीझन ग्रुप आहे त्यात वयाने सर्वात लहान सदस्याचं वय आहे ८३ आणि तिथून पुढे म्हणजे अगदी ११४ वयापर्यंत चे  'तरूण' लोकं. पोट तुडुंब भरेपर्यंत जेवणारे आणि तृप्तीची ढेकर देणारे आपण भारतीय असुदेत किंवा फास्ट फूड, जंक फूड ह्यांच्या संपूर्ण आहारी गेलेले ते अमेरिकन्स... आयुष्यभर इतकं मनसोक्त हवा तसा आहार असुन पण का वयाच्या चाळिशी नंतर तब्ब्येतीच्या एक एक तक्रारी आगंतुक पाहुण्यासारख्या येतात आपल्याकडे? का आपल्या देशांमध्ये आयुर्मानं कमी होत चालली आहेत? आणि तेच ओकिनावा मधील हे वयाची शंभरी ओलांडलेले पण मनाने कायम तरुण असलेले आजी आजोबा...

ह्या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तर आहेत हेक्टर गार्शिआ आणि फ्रान्सिस मिरेल्स लिखित इकिगाई ह्या पुस्तकात.

जपानमधील लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी अंगीकारलेली ही जीवनपद्धती केवळ थक्क करूनच नाही सोडत तर "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" ह्या आपल्या मातीत जन्मलेल्या ओळींचा खरा अर्थ त्या शेकडो मैल दूर राहणाऱ्या जापनीज लोकांनाच खऱ्या अर्थाने उमगलाय ह्याची अनुभूती येते.



"इकिगाई...."
जे करत आहोत ते आवडीने करण्यापेक्षा आवड शोधून ते आनंदाने करणे कधीही जास्त आनंददायी.

"इकिगाई" ही जपानी संकल्पना आहे. इकीगाई म्हणजे आपल्या असण्याचं कारण, रोज सकाळी उठण्याचं कारण किंवा प्रयोजन. माणूस जे जगतो त्या जीवनाचा अर्थ, पॅशन किंवा आवड, हेतू समजणं किंवा माणूस ज्यासाठी जगतो ते काहीतरी सापडणं म्हणजे इकिगाई. 'इकिगाई' नावाचं नक्की वाचावं असं सुंदर पुस्तक आहे. या पुस्तकात दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जगण्याचं रहस्य सांगितलं आहे. सतत व्यस्त राहण्यामध्ये आनंद आहे असे हे पुस्तक सांगते.

"जपानी लोकांच्या मते प्रत्येकाच्या जीवनाचा एक इकिगाई असतोच, काहींना तो मिळालेला असतो तर काही त्याला शोधत असतात."

 छंद जोपासणे, हलका व्यायाम, कधीही निवृत्त न होणं, ८०% पोट भरेल एवढं जेवणं, सतत सूप पित राहणं,  मित्र मैत्रिणी, आप्त यांना वेळ देणं, सक्रिय शरीर आणि मन, तणाव न घेणं, थोडं अवघड काम करणं अशा असंख्य गोष्टी जपानी जीवन पद्धतीचा भाग आहेत.
"गरज नसतानाही सतत कार्यरत राहण्यासाठी तुम्हाला तुमचा इकिगाई माहिती असणं आवश्यक असतं. तुमचा इकीगाई तुम्हाला सतत लोकोपयोगी आणि आकर्षक गोष्टी बनवण्यासाठी प्रेरणा देत राहतो."

बऱ्याचदा आपण कमावण्यासाठी आयुष्यभर काहीतरी करत राहतो, त्यामागे धावत राहतो. पण आपण जे करत असतो तोच आपला ईकिगाई आहे का, आपण तेच करतो आहोत का जे आपल्याला करायला मनापासून आवडते, हा प्रश्न आपण कधी स्वतःला विचारतो का(साधारणपणे वयाच्या तिशीनंतर हा प्रश्न पडायला लागतो ज्याला midlife crisis असे ही म्हणतात.)
वयाच्या कोणत्याही टप्प्यावर थांबून आपला इकिगाई शोधायला हवा, शोधता येतो खरं तर. आपला इकीगाई समजण्यात, आयुष्याकडे पुन्हा एकदा नव्याने, वेगळ्या नजरेने पाहण्यात हे पुस्तक काही अंशी का होईना नक्की मदत करेल.

हे मूळचे इंग्रजीत लिहिले गेले आहे. खरं तर अशी जीवन जगायला शिकवणारी आणि प्रेरणादायी वर्गवारीतील पुस्तके मी कधी वाचली नाहीत. पण याचे नाव ऐकले होते, म्हणून घेऊन वाचले, आवडले.

"आनंदी राहण्यात दीर्घायुष्य आहे.

Sunday, 19 March 2023

पुस्तक:"पाकिस्तान अथवाभारताची फाळणी" लेखक: डाॅ. बी. आर. आंबेडकर

पुस्तक:"पाकिस्तान अथवा भारताची फाळणी"
लेखक: डाॅ. बी. आर. आंबेडकर

  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1940 ला हे पुस्तक लिहिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक दृष्टा महापुरुष! तसेच ते अत्यंतिक राष्ट्रभक्त! त्यांनी आपले विचार भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी मांडले.विरोध पत्करून कृती केली.जेंव्हा पाकिस्तान ची मागणी जोर धरत होती तेंव्हा हे  पुस्तक लिहिले.

 तत्कालीन परिस्थिती मुसलमान समाजाची मानसिकता , त्यांचा इतिहास , समाजातील स्त्रियांची स्थिती यावर परखड मत बाबासाहेब यांनी व्यक्त केले आहे . 

पृष्ठ:३३६ हार्ड कव्हर

मूल्य:४००
 
अनुक्रमणिका

● प्रस्तावना

भाग पहिला : पाकिस्तानकरता मुस्लिम जनतेची स्थिती.!

•भाग दुसरा : पाकिस्तानविरुध्द हिंदूंची विचारधारा

•भाग तिसरा : पाकिस्तानचा पर्याय.?

•भाग चौथा : पाकिस्तान ची संवेदना

•भाग पाचवा : पाकिस्तानच्या समस्या

•पुस्तक कसे आहे.? त्यातील एक पृष्ठ

लाला लजपतराय

लाला लजपतरायांनी सी.आर.दास यांना लिहिलेल्या पत्रात पुढील भीतीचा उल्लेख केलेला आढळतो...

 'दिवसापासून मला एका गोष्टीचे शल्य डिवचत आहे , त्यावर आपण जास्तीतजास्त सावधनपूर्वक विचार करू शकाल अशी मला आशा आहे . मी सहा महिनीच्यावर काळ मुस्लिम इतिहास आणि मुस्लिम कायद्याच्या अध्ययनात घालविला .त्यावरून हिंदू-मुस्लिम ऐक्य हे अशक्य व प्रयोगात आणण्यासारखे नाही अशी माझी स्पष्ट धारणा झालेली आहे ."

पुस्तकावर काही अधिक लिहिण्यापेक्षा हे पुस्तक वाचणे हेच चांगले.


Tuesday, 28 February 2023

रिच डॅड पुअर डॅड.... /लेखक:रॉबर्ट टी. कियासोकी

               रिच डॅड पुअर डॅड.          

जे पुस्तक वाचल्यानंतर प्रत्येकाला वाटते उशीर झाला.! 
आधी वाचायला हवे होते.!
प्रत्येक जाणते पालक आपल्या मुलाला वाचायला सांगतात ते पुस्तक.! 
आर्थिक क्षेत्रातील आपली दृष्टी व्यापक बनवणारे...
महत्वाकांक्षी व्यक्तिमत्व घडवणारे पुस्तक! 
जे पुन्हा पुन्हा वाचले पाहिजे! 
भोळसट आर्थिक धारणा असलेल्या अप्त नातेवाईक मित्रांना आवर्जून भेट देण्यासाठी अतिशय प्रभावी असलेले पुस्तकं..!


धन , संपत्ती जोडवी कशी या काळात याचे मार्गदर्शन करणारे सर्वोत्कृष्ट पुस्तक..!

वन ऑफ द बेस्ट सेलर बुक:Rich Dad Poor Dad मराठीत..!
करोडो प्रती जगभर विकल्या गेल्या आणि विकल्या जात आहेत.
लाखो लोकांचे जीवनमान बदलून टाकणारे पुस्तक!
नक्की वाचावे...

पुस्तकाचे नाव: रीच डॅड पुअर डॅड (मराठी)

लेखक:रॉबर्ट टी. कियासोकी

पृष्ठ:३०५
मूल्य:४९९/
"बेस्ट  वैयक्तिक अर्थकारणावरचे सर्वाकालीन क्र.1  चे पुस्तक !"


पैशांबाबतच्या अशा गोष्टी ज्या श्रीमंत आपल्या मुलांना शिकवतात, गरीब व मध्यमवर्गींय शिकवत नाहीत.रिच डॅड पुअर डॅड-  रॉबर्ट टी. कियोसाकी या इंग्रजी लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद अभिजित थिटे यांनी केला आहे.

 जागतिक कीर्तीच्या लेखकांनी प्राध्यापकांनी व व्याख्यात्यांनी वाचून दोन  ओळीत आपले अभिप्राय लिहिले आहेत त्यातील एक अभिप्राय -

आर्थिक परिस्थिती सुधरण्याची इच्छा असेल तर रिच डॅड , पुअर डॅड अवश्य वाचा तुमच्या आर्थिक भविष्यासाठी आणि बाजारपेठेच्या अभ्यासाठी ते उपयुक्त आहे. -झिग झिगलर जागतिक कीर्तीचे लेखक आणि व्याख्याते

श्रीमंत कसं व्हायचं आणि असेलेलं कसं टिकवून ठेवायचं, या विषयीची साद्यंत माहिती, खरंतर शहाणपण हवं असेल तर हे पुस्तक अवश्य वाचा !! सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मुलानांही वाचायला लावा त्यासाठी गरज पडल्यास त्यांना लाचही द्यायला हरकत नाही. -मार्क व्हिक्टर हनसन सहलेखक, न्यूयॉर्क टाइम्स चिकतन सूप फॉर द सोल
 
रिच डॅड पुअर डॅड- हे  काही पैशांविषयीच्या इतर पुस्तकांसारखं नाही . एकतर हे वाचायला सोपं आहे आणि त्यातील महत्वाचे संदेशही सहजपणे उमगतील इतक्या सोप्या भाषेत आहेत.

मी तरुण असताना हे पुस्तक वाचायला हवं होतं किंवा खरंतर माझ्या पालांनीच हे पुस्तक वाचणं जास्त उपयुक्त ठरलं असतं. तुम्हांला जितकी तुलं आहे त्या प्रत्येकाला हे पुस्तक विकत घेऊन द्या.

 नातवंडासाठीही काही प्रती खरेदी करुन ठेवा . मूल 8-9 वर्षाचे झालं की त्याला हे पुस्तक भेट म्हणून दयायलाच हवं.--(स्यू ब्रॉन-अध्यक्ष , टेनंट चेक ऑफ अमेरिका )

रिच डॅड पुअर डॅड- हे पुस्तक म्हणजे चटकन श्रीमंत होण्याचा मंत्र नाही. हे पुस्तक तुम्हांला तुमच्या आर्थिक बाबी जबाबदारीनं कशा हाताळायच्या हे सांगतं.पैशावर प्रभुत्व मिळवून मालमत्ता वाढवायला हे पुस्तक शिकवतं. तुम्हांला तुमची आर्थिक बुध्दिमत्ता वाढवायची असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. (डॉ.एड कोकेन--अर्थशास्त्राचे प्राध्यापक , आरएमआयअी विद्यापीठ, मेलबोर्न)
 
हे पुस्तक मी वीस वर्षापूर्वीच वाचायला हवं होतं. --लेरीस क्लर्क -(डायमंड की होम्स, आयएनसी मॅगझीननं यांना १९९५ साली अमेरिकेतील सर्वात वेगानं वाढणारी कंपनी अशी मान्यता दिली आहे.)

आपल्या आर्थिक भविष्यावर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करणा-या सर्वांसाठी रिच डॅड पुअर डॅड- ही प्राथमिक पायरी आहे. ---यूएसएटुडे

जगभरातील अब्जावधी लोकांच्या पैशाबद्यल विचार करण्याच्या पध्दतीला रॉबर्ट कियोसांकीनी आव्हान दिले व ती बदलून टाकली. रुढीबध्द शहाणपणाला सहसा छेद देणा-या दृष्टिकोनामुळे रॉबर्ट यांची सडेतोड बोलण्याबद्दल परखडपणाबद्दल व धीटपणाबद्दल प्रसिध्दी आहे. आर्थिक्‍ शिक्षणाचे तळमळीचे पुरस्कर्ते म्हणून जगभर त्यांना ओळखले जाते.
 
लोक आर्थिकद्ष्टया ढगडत राहतात याचं मुख्य कारण म्हणजे ते अनेक वर्ष् शाळेत गेलेले असतात.पण पैशांबदद्यदल काहीच शिकलेले नसतात  परिणामी लोक पैशासाठी काम करायला शिकतात, पण पैशाला कामाला लावायला कधील शिकत नाही ---रॉबर्ट टी. कियोसाकी


Tuesday, 31 January 2023

पुस्तक - व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची / लेखक: डॉ गिरीश आफळे

"व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची"

"गांधीजी - नेहरू ने हम पठानोंका प्रदेश पाकिस्तान को तश्तरी में डाल के दे दिया और हमें इन चील कौव्वों सामने( पाकिस्तान मध्ये)मरने के लिए छोड़ दिया." - खान अब्दुल गफार खान

पुस्तक: व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची

लेखक: डॉ गिरीश आफळे

प्रस्तावना: प्रशांत पोळ

पृष्ठ:४८८

मूल्य:६००/



खैबर पख्तूनख्वा  हा प्रांत सरहद्द गांधी  म्हणून ओळखल्या गेलेल्या खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वात भारतात राहू इच्छित असताना नेहरूंनी मात्र तो पाकिस्तान ला भेट स्वरूपात दिल्या सारखा दिला...तेथील लोकांची इच्छा नसताना.तेथील प्रांतिक कायदेमंडळ हे मुस्लिम लीग चे नव्हते...ते काँग्रेसचे होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय अभ्यासपूर्ण अशी लोकसंख्येच्या आदलाबदलीची मांडणी केली होती.परंतु काँग्रेस ने ही अदलाबदली धुडकावून लावली. जीना देखील लोकसंख्येच्या आदलाबदलीसाठी आग्रही असताना काँग्रेसने ही भयंकर चूक केली होती...ज्या काँग्रेस ला मुस्लिम मतदार संघात घोर पराभव झालेला होता.मुस्लिमांनी नाकारले होते....

जगातील सर्वात मोठ्या विस्थापनाच्या आणि हिंसाचाराच्या काळात काँग्रेस ने काय केलं?भारतात जीव मुठीत घेऊन पाळणाऱ्या हिंदू आणि शिखंच्या जीवांचे रक्षण करण्यासाठी काही केले का? का आलेल्या बेघर निर्वासितांची काही सोय काँग्रेसने लावली? त्यांना अन्न, पाणी देऊ केले का?त्यांच्या निवाऱ्याची सोय केली? 
या प्रश्नांचे उत्तर शोधूनही "हो" असे सापडत नाही.प्रचंड मोठी असहकार आणि चलेजावची मोहीम राबवणाऱ्या काँग्रेसकडे आता मात्र माणसं नव्हती.

भारताची फाळणी अतिशय वेदनादायी होती. साधारणता पाच ते दहा लाख हिंदूं आणि शिखांना या फाळणीच्या दंगलीमध्ये फुटीर अतिरेक्यांनी मारले. बाटवले सर्वस्व लुटले. सुमारे दीड कोटी हिंदूंना आपलं सर्वस्व सोडून आपल्याच देशात परागंदा व्हावे लागले. हिंदुस्तानची फाळणी ही हिंदूंच्या वंश विच्छेदाची सर्वात मोठी घटना! फाळणी खरंच अटळ होती का?
या संदर्भात आपल्याला अनेक असे मुद्दे आपल्याला सुन्न करून सोडतात....

हा ग्रंथ भारताच्या फाळणी पर्यंत न थांबता पुढं काश्मीर युद्ध आणि महात्मा गांधींची हत्या या भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या घटनांना ही समाविष्ट करते..

या पुस्तकातील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ! 
५०० हून  अधिक स्वयंसेवकांनी  स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन हिंदूंना सुखरूप भारतात पोहोचवले.त्या स्वयंसेवकांचे बलिदान कसं झाले, त्यांचे प्रयत्न आणि त्यांची पराकाष्ठा सर्व या पुस्तकात वाचायला मिळते.त्यांची नावे, गावे तपशीलवार वाचायला मिळते.शेवटचे प्रकरण नेहरू, पटेल  आणि संघावर आहे.पंडित नेहरू यांचा पूर्वग्रदूषित संघाबाबतचा दृष्टिकोन ,काश्मीर प्रश्नात संघाचे योगदान या साठी तर हे पुस्तक अधिक उपयुक्त ठरते.

प्रत्येक भारतीयाने हे पुस्तक वाचून विचार केला पाहिजे...

हिंदुस्थानच्या फाळणीची सखोल पार्श्वभूमीसह ,तपशीलवार अभ्यास करून मांडणी केलेला ग्रंथ ,जितका व्यापक तितकाच संदर्भ.! लेखकाचा स्वभावच'अभ्यासोनि प्रकटावे' असा आहे.त्याचा अनुभव या ग्रंथात पानोपानी येतो. 
५० पृष्टांचे परिशिष्ट आणि संदर्भ ग्रंथ सूची आहे.
हा ग्रंथ २६ प्रकरणे आणि ४७५ उपप्रकरणे किंवा बिंदुंच्या माध्यमातून साकारला आहे.
प्रत्येक मुद्द्याला शीर्षक दिलेले आहे.या सर्व मुद्द्यांचा अनुक्रमणिका(२० पेज) मध्ये समवेश केल्यामुळे नेमका संदर्भ हवा तेंव्हा शोधने सुकर झालेले आहे.

संदर्भ आणि नोंदी अधिक असतील तर अनेक वेळा ग्रंथ बोजड होतो.वाचनाला गती येत नाही.पण हा ग्रंथ अतिशय प्रवाही आणि प्रभावी आहे.सोपी आणि तरल अशी भाषा आहे.क्लिष्टता अजिबात नाही.त्यामुळं फाळणीचा इतिहास,पार्श्वभूमी आणि परिणाम सर्व एकत्र वाचायला मिळते आणि ते वाचावेसे वाटते.

अधोरेखित करायचे ठरले तर सगळं पुस्तकच अधोरेखित होईल,इतकी माहिती आपल्याला यात वाचायला मिळते.अनेक पत्र जे आपल्याला थक्क करून सोडतात.

"निजामाचे राज्य हे शंभर टक्के स्वदेशी...." - महात्मा गांधी "..... मला विचाराल, तर ब्रिटिश किंवा इतर कोणाही परकीय सत्तेच्या सुव्यवस्थेत राजवटीपेक्षा मी अराजकच अधिक पसंत करेल. इतर संस्थानिकांना मांडालिक बनवून किंवा सरहद्दीवरील मुसलमान टोळ्यांची मदत घेऊन निजाम भारताच्या गादीवर बसला, तर त्याला मी निश्चित मी निःसंदिग्ध संमती देईल. निजामाचे राज्य हे शंभर टक्के स्वदेशी राज्य आहे असे मी मानतो...

Saturday, 31 December 2022

'भगवान श्रीकृष्णाचे अखेरचे दिवस' पुस्तक

'भगवान श्रीकृष्णाचे अखेरचे दिवस'

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त, संजीब चट्टोपाध्याय लिखित कादंबरीचा हा मराठी अनुवाद - 'भगवान श्रीकृष्णाचे अखेरचे दिवस'

मराठी अनुवाद: रमा हर्डीकर सखदेव

पृष्ठ:१८०

मूल्य:२५०/




महाभारताचं महायुद्ध समाप्त झालं. कौरवांच्या कुळाचा पूर्ण संहार झाला होता. सगळी युद्धभूमी प्रेतांच्या खचाने भरुन गेली होती. रक्ताच्या ओहळांनी भिजून गेलेल्या भूमीवर, तो मुत्सद्दी राजकारणी, रणनीतीकार कृष्ण उभा होता. आणि त्याच्या आजूबाजूला होत्या कुरु स्त्रिया, ज्यांचे पती, बंधू, पिता आणि पुत्र युद्धात बळी गेले होते. त्या त्याला शिव्याशाप देत होत्या. या भयकारी स्थितीला जबाबदार कोण होता?

दुसरा-तिसरा कुणी नाही, तर स्वतः प्रभू, परमेश्वर, ज्याने स्वतः जाहीर केलं होतं की, पृथ्वीला पापांच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी तो अवतार धारण करेल. त्यामुळे जेव्हा मातांनी त्याला तुझ्या नशिबीदेखील असेच भोग येतील' असा शाप दिला, तेव्हा परमेश्वराने तो मंदस्मित करत शांतपणे स्वीकारला.

अशा प्रकारे या कादंबरीची सुरुवात होते, ज्यात लेखक संजीब चट्टोपाध्याय प्रभू कृष्णाच्या जीवनाचा धांडोळा घेतात. विष्णूच्या अवतारांपैकी एक असलेल्या या अवताराच्या जीवनातल्या महत्त्वाच्या क्षणांकडे निर्देश करतात 

- गोकुळातला खट्याळ मुलगा, वृंदावनातला रहस्यमयी प्रेमिक, कंसाचा वध करणारा, द्वारकेमधला यादवांचा प्रमुख आणि अखेरीस कुरुक्षेत्रावरच्या महायुद्धाची आखणी करणारा मुत्सद्दी राजकारणी...!

ऑनलाइन खरेदी करण्यासाठी कॉमेंट करा..

पुस्तक: देवाच्या शोधात माझा प्रवास लेखिका: गौरी अनिल इंदुलकर

देवाच्या शोधात हे पुस्तक ईश्वराच्या अस्तित्वाचे लेखिकेला आलेले पुन्हा पुन्हा प्रत्यंतर होय! श्रध्देचा आणि वाचनाचा परिणाम म्हणून लेखिकेला जे ...