वाचन संस्कृती अबाधित राहण्यासाठी वाचनाचे महत्व
‘वाचाल, तर वाचाल’ या म्हणीचा अर्थ आणि त्या अर्थाचे अन्वयार्थ किती समर्पक आहेत हे आजच्या घडीला समजत आहे. ‘ग्रंथ हेच गुरू’ असे म्हटले जाते. अर्थात माणसाच्या आयुष्यात एक ग्रंथ हा आमूलाग्र बदल करू शकतो. गुरू जसा आयुष्यात मार्गदर्शन करत असतो, त्याचप्रणाणे ग्रंथ वाचनाने आपल्या आयुष्याला विविध वळणे मिळत असतात. आज वाचन कमी होत आहे, असे प्रकर्षाने जाणवत आहे.
तरुणाईचा वाचनाकडे कल कमी असल्याने वाचन संस्कृती हळूहळू लोप पावत आहे, असे म्हटले तरी ते वावगे ठरू नये.
तासन्तास ऑनलाईन चॅट करत राहणारी आजची तरुणाई सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे. माणसाची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्याचे ज्ञान आणि हे ज्ञान संपादन करण्यासाठी वाचण्याशिवाय पर्याय नाही. या स्पर्धेच्या अहमहमिका युगात कोणत्याही क्षेत्रात टिकायचे असेल, तर त्या क्षेत्रातील ज्ञान असणे अनिवार्य आहे, तर आणि तरच तुम्ही त्या क्षेत्रात टिकाव देऊ शकता. ‘नॉलेज ईज पॉवर’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. ‘वाचाल, तर वाचाल’ म्हणजे तुम्ही जर वाचाल तरच स्पर्धेच्या युगात वावरू शकाल. वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल आणि पयार्याने त्याचा उत्तम युवापिढी घडण्यासाठी उपयोग होईल. माणूस ज्ञानाच्या या शक्तीच्या सहाय्याने त्याच्या सदसद्विवेकबुद्धीत भर पडते तसेच प्रगल्भ होतो आणि महत्त्वाचे म्हणजे त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो.
पूर्वीच्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन कमी आहे, अशी तक्रार सर्वच थरातून होत आहे. याला स्वाभाविकपणे कारण ते म्हणजे मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडिया आणि त्याच्या सभोवती असणारे वातावरण, कुटुंबात जर वाचन केले जात असेल, तर मुलांना वाचनाची गोडी निर्माण होईल. परंतु याउलट घरात वातावरण असेल, तर मुलांमध्ये वाचनाची आवड कशी निर्माण होईल? यासाठी मुख्यत: पालकांनी वाचनाची गोडी मुलांमध्ये निर्माण केली पाहिजे. आपण अनेकवेळा ऐकले असेल की, पूर्वीच्या लोकांना सकाळी चहाबरोबर पेपर वाचण्यासाठी लागत असे. पेपर वाचल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नसे; परंतु आता काळानुरूप परिस्थिती बदलली आहे. पूर्वी पेपरमधून बातम्या वाचल्यामुळे वाचनाची आवड निर्माण होत असे. परिणामी ‘वाचनाचे वेड’ यामुळे वाचन रोज होत असे, कालांतराने त्याच पेपरमधील बातम्या आपण रोडिओवर ऐकू लागलो. पुढे टीव्हीचा उदय झाल्याने त्याच बातम्या टीव्हीवर पाहू लागलो आणि आता सोशल मीडियामुळे बातम्या ऑनलाईन पाहू लागलो. विज्ञानाने प्रगती केल्यामुळे आपण फॉरवर्ड झालो असलो तरी, वाचनातून आनंद घेण्याचे आपण हरवून बसलो. वाचनातून जो आनंद मिळतो तो आनंद विरळाच असतो.
वाचनामुळे अनेक व्यक्तींच्या जीवनाचे सोने झाले. अगदी लहानपणी केळुसकर गुरुजींनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘बुद्ध चरित्र’ हे पुस्तक भेट म्हणून दिले होते. या पुस्तकाचा परिणाम एवढा झाला की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या घटनेचे शिल्पकार झाले, तर ‘राईटस ऑफ मॅन’ हे थॉमस पेन यांचे पुस्तक वाचून महात्मा फुले यांना प्रेरणा मिळाली, त्यामुळे महात्मा फुले थोर समाजसेवक झाले. हे सर्व फक्त आणि फक्त वाचनामुळे शक्य झाले. अशी अनेक उदाहरणे आहेत.
वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी आणि प्रत्येक माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी वाचनाची आवड लहानपणापासूनच निर्माण होणे आवश्यक आहे. तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करायची असेल, तर तशी परिस्थिती त्यांच्याभोवती निर्माण करणे गरजेचं आहे, जेवढे वाचन कराल तेवढे ज्ञान वाढत जाईल. ‘ग्रंथ हे गुरू’ आहेत आणि ग्रंथ वाचनाने दिशा ठरत असते, एक पुस्तक हे एका मित्रासारखे असते. मित्रांचा जसा आपल्यावर प्रभाव असतो, त्याचप्रमाणे एक पुस्तक आपल्यावर विविध पैलू पाडण्यास कारणीभूत ठरते. पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारते आणि असे मस्तक सहजासहजी कोणाही पुढे नतमस्तक होत नसते, असे म्हटले जाते. वाचनाची सवय एकदा लागली की, माणूस मनावरचा ताण कमी करण्यासाठी पुस्तकांच्या सहवासात गुंगून जातो. पुस्तकांमुळे कमकुवत मनाला धीर मिळतो. त्यामुळे निराशेच्या गत्रेत अडकलेला माणूस आत्महत्या, हत्या असे प्रकार करण्यापासून परावृत्त होतो. मात्र आज वाचनासाठी अनेक उत्तम साधने उपलब्ध असूनही, तरुण पिढी वाचनापासून दूर जात आहे. अधिक अधिक इंटरनेटवर वेळ घालवत असल्याचे आजचे चित्र आहे. नव्या माध्यमांच्या आगमनाने वाचन संस्कृती लोप पावत आहे. तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी विविध उपक्रमांद्वारे जनजागृती निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
अनेक महान व्यक्तींनी ‘तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल, तर वाचन करा’ असा संदेश दिला आहे. सखोल विचारातूनच एकरूप समाज निर्मित होत असते आणि सखोल विचार करण्याची सवय चांगल्या वाचनातूनच तयार होते.
वाचन म्हणजे जीवनाला उन्नत करणारी बाब असून यामुळे बुद्धीची मशागत होते. माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्त्वाचा वाटा असतो. त्याचप्रमाणे जगण्याच्या परिपूर्णतेसाठी वाचन हे आवश्यक आहे. ज्ञानात सतत वाढ करण्यासाठी वाचन हा एकमेव मार्ग आहे. आज वाचनालयांची जागा इंटरनेट आणि ई-बुकने घेतली आहे. विद्यार्थ्यांनी उन्हाळी सुट्टीत खेळण्याबरोबर विविध विषयांचे अवांतर वाचन केले पाहिजे. कारण अवांतर वाचनामुळे मतपरिवर्तन होऊ शकते.
पुस्तकांमधील समृद्ध विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. वाचनाने आपली शब्दसंपदा वाढते, अनुभवांसह कल्पना, आशा-आकांक्षा जागृत होतात, वाचनामुळे रसिकता वाढीस लागते, सृजनशीलतेत भर पडते, सहृदयता, दुस-याच्या दु:खाची जाणीव, ती समजून घेण्यासाठी आवश्यक असणारे संवेदनशील मन यांस खतपाणी मिळते. इतरांबाबत, समाजाबाबत, आपली काही कर्तव्ये आहेत याचे भान प्राप्त होते. मन संकुचित, क्षुद्र गोष्टीत अडकत नाही. वाचनामुळे मेंदूला चालना मिळते, नवीन शब्दांमुळे त्याच्यात प्रगती होते, वाचनामुळे नवनवीन माहिती मिळतेच तसेच ज्ञानात भर पडते. वाचनामुळे आपल्याला इतरांचे ऐकायची सवय लागते. ऐकण्यासाठी संयम असायला हवा. वाचनामुळे आपण आपोआप संयम राखायला शिकतो. सामान्य ज्ञान वाढते, वाचनामुळे आपण मित्रमंडळी किंवा लोकांमध्ये वावरताना एखाद्या विषयावरील चर्चेत आपले मुद्दे योग्य प्रकारे मांडू शकतो. वाचनामुळे अनेक फायदे आपण घेऊ शकतो. मानसिक उत्तेजना मिळण्यास मदत होते, मनावरचा ताण कमी होतो, एकाग्रता वाढल्यामुळे एखादे ध्येय गाठण्यास मनाची एकाग्रता कामी येते. माजी राष्ट्रपती स्वर्गीय ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करत आपण वाचन संस्कृतीची जनजागृती करत आहोत. पुस्तकांविषयी ही कायमची ओढ तरुणांच्याही मनात निर्माण होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
पालकांनी किंबहुना कुटुंबातील प्रत्येक सदस्यांने घरात वाचनाची वातवरण निर्मिती केली पाहिजे, जेणेकरून मुलांमध्ये लहानपणापासून वाचनाची आवड आणि गोडी निर्माण होईल. तेव्हाच ख-या अर्थाने वाचन संस्कृती वाढण्यास मदत होईल.