Showing posts with label Marathi Book Review. Show all posts
Showing posts with label Marathi Book Review. Show all posts

Saturday, 16 December 2023

पुस्तक: देवाच्या शोधात माझा प्रवास लेखिका: गौरी अनिल इंदुलकर

देवाच्या शोधात

हे पुस्तक ईश्वराच्या अस्तित्वाचे लेखिकेला आलेले पुन्हा पुन्हा प्रत्यंतर होय! श्रध्देचा आणि वाचनाचा परिणाम म्हणून लेखिकेला जे दिव्य अनुभव आले,त्या अनुभूतीची ,त्या दैवी सहवासाची आणि कृपेची शब्दात केलेली मांडणी म्हणजे हे पुस्तक!

पुस्तक: देवाच्या शोधात माझा प्रवास
लेखिका:  गौरी अनिल इंदुलकर
प्रकार:  अध्यात्मिक आत्मकथन
पृष्ठ: २२६
मूल्य: ३००

विज्ञानवादी किंवा तर्काने समजून घेणाऱ्या  विश्लेषकाला या पुस्तकातील सर्व घटना योगायोग किंवा सामान्य घटना वाटू शकतील. काहींना अंधविश्वास ही वाटेल...पण श्रध्देने जर विचार केला तर यातील प्रत्येक प्रसंग आपल्याही आयुष्यात येऊ शकतो,आपल्यालाही अनुभूती होऊ शकते...अगदी ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा वाचताना देखील!

अमेरिका सारख्या अतिशय सधन देशात रियल इस्टेट सारख्या व्यवसायात अमाप पैसा आणि संपत्ती मिळवलेल्या लेखिकेला वाचनाची प्रचंड आवड! त्यातही अध्यात्मिक पुस्तकांची ओढ अधिक!
ज्ञानेश्वरी चे वाचन करतां करतां लेखिका कुंडलिनी संदर्भात वाचते आणि त्याचा अभ्यास करायला लागते.योगी कथामृत वाचून साधना सुरू करते.श्री गाजाजन विजय ग्रंथ सहज झोपाळ्यावर बसून वाचताना असा काही दिव्य अनुभव येतो,की असे ग्रंथ वाचताना काही नियम असावेत असं वाटतं आणि अनुभवी साधकांशी संवाद सुरू होतो....त्यातून अनेक असे प्रसंग घडतात...जे कल्पनेत ही येऊ शकतं नाहीत.

प्रत्येक प्रकरण वाचताना सजह आणि सोपे वाटतं...पण वाचन झाल्यानंतर मात्र आपल्याला त्या मागची मोठी भूमिका समजते.त्याचा परिणाम होऊ लागतो.आपल्याला माहीत असलेल्या किंबहुना अनेक वेळा वाचलेल्या पुस्तकांचे,ग्रंथांचे मोल समजून येते...जसे तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्वरी!

प्रस्तुत पुस्तकाच्या मुखपृष्ठावर त्रिशूळ आहे. त्या त्रिशुलाचे लेखिकेला प्रकाशमान असे दिव्य दर्शन झालेलं आहे...
या पुस्तकाच्या बाबत लेखक आणि इतिहासकार असलेले संदीप भानुदास तापकीर  लिहितात,"अध्यात्मासारख्या एका दैवी व रहस्यमय विषयाशी ओळख झाल्यानंतर जिज्ञासा कशी वाढते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गौरी अनिल  इंदुलकरांचे "देवाच्या शोधात" हे पुस्तक! दहा वर्षे मेडिटेशन केल्यानंतर त्यांची चेन्नईच्या भगवती स्वामींची भेट झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. वीस वर्षे देवी साधना केलेल्या लेखिकेला या काळात आलेल्या रहस्यमयी, दिव्य व मती कुंठीत करणाऱ्या अनुभवांची आत्मकथा वाचताना आपण भारावून जातो. विशेष म्हणजे मुखपृष्ठावरील त्रिशूल व कुंडलिनी शक्ती यांचे प्रत्यक्ष जिवंत दिव्य दर्शन लेखिकेला झाले आहे."

"आपल्याला आलेल्या अनुभवांची इतर साधकांना माहिती मिळवून प्रोत्साहन मिळावे, हा लेखिकेचा उद्देश निश्चित सफल झाला आहे. देवी अनुभवाचे नाते आपल्या कुटुंबाशी, समाजाशी, धर्माशी व राष्ट्राची नक्कीच आहे, हे या पुस्तकात वाचायला मिळते.मोठमोठे धार्मिक ग्रंथ वाचायला आजकाल कोणालाच वेळ नाही. विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक तसेच अध्यात्माच्या मार्गावर असणाऱ्या सर्वांनाच हे पुस्तक यशस्वी होण्यासाठी ही गुरुकिल्ली आहे."


Friday, 5 May 2023

पुस्तक: आर्यांचे आक्रमणअगा जे घडलेचि नाही!लेखक: मिशेल डॅनिनो

दक्षिण विरुद्ध उत्तर,तमिळ विरुद्ध हिंदी, आर्य विरुद्ध द्रविड असे भेद निर्माण करून राजकारण करणाऱ्यांना खरा अभ्यास मान्य होईल का?

भारताची  एकात्मता आणि स्वाभिमान खंडित करण्यासाठी परकियांनी अनेक खोटे सिद्धांत मांडले.भेद निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर थेरिज पसरवल्या! काही भारतीयांनी ही त्यांना उचलून धरले....असाच एक सिद्धांत म्हणजे आर्य आक्रमणाचा सिद्धांत!

आर्य आक्रमण सिद्धांत खोडून काढणारे दोन ग्रंथ!

पुस्तक:आर्यांचे आक्रमण
अगा जे घडलेचि नाही!

लेखक: मिशेल डॅनिनो

मराठी अनुवाद: सुहासिनी देशपांडे

प्रकाशन: विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, मराठी प्रकाशन विभाग

पृष्ठ:१५६ मूल्य:१५०/

संघटित करणाऱ्या, गौरान्वित करणाऱ्या ज्या अस्मिता आहेत,त्यावरच आघात करून वर्ग संघर्ष निर्माण करायचा! समाजाचे विघटन करून सत्ता बळकट करायची .ही निती इंग्रज आणि त्यानंतर डाव्या विचारधारा मानणाऱ्या लोकांनी भारतात जोरदारपणे राबवली.त्याचाच परिणाम म्हणून उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत, हिंदी विरोध अशा काही गोष्टी काहीकाळ या  देशात घडल्या.राष्ट्रीयत्व दुबळे करून प्रादेशिक अस्मिता उभ्या करताना ज्या सिद्धांतांचा उपयोग केला त्यात आर्य विरुध्द अनार्य हा एक होता.

पण हा सिद्धांतच मुळात चुकीचा आहे,असा निर्वाळा अनेक विद्वान देतात,त्यापैकी एक फ्रेंच विद्वान मिशेल डॅनिनो!

दुसऱ्या प्रकरणात लेखक काही विद्वानांची मतं देतात.पहिल्या प्रकरणात या सिद्धांताचा उगम कसा झाला याची माहिती दिलेली आहे.त्यात वेगवेगळी विद्वान आणि त्यांचे युक्तिवाद आहेत.

माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन-'एका मध्यवर्ती केंद्र स्थानापासून आर्यांचा प्रसार झाला.' हा सिद्धांत म्हणजे मनमानी व समर्थन करताना येण्याजोगे गृहीतक असल्याचे ते म्हणतात.

याच प्रकरणात आर्य सिद्धांत मांडणारे मॅक्स मुलर स्वतःचाच सिद्धांत कसा चुकला याचे विवेचन करताना सांगितले आहे.ते म्हणतात, "जेंव्हा मी आर्य म्हणतो त्यावेळी मला ना रक्त ना अस्थी ना केसांचा रंग ना कवटीचां आकार अभिप्रेत असतो, तर केवळ जे आर्य भाषा बोलतात ते आर्य, असे मला म्हणायचे असते,हे मी वारंवार स्पष्ट केलं आहे." १८८८ अर्थात पहिला सिद्धांत मांडला आणि त्याचे खंडन ४० वर्षांनी त्यांनी केलं.

मॅक्स मुलर यांनी भारतीय ग्रंथाच्या कलाविषयी आपल्या प्रसिद्ध अशा घोषणा पत्रात सन १८९० मध्ये लिहिले,"जगातील कोणतीही शक्ती हे कधीच निश्चित नाही करू शकणार की वेदांची निर्मिती इस.१००० वर्षांपूर्वी झाली, की १५०० की २००० की ३००० वर्षांपूर्वी झाली." स्वतःच्या आत्मचरित्रात त्यांनी या पुढं जाऊन लिहिलं आहे."वेदांच्या निर्मितीच्या वास्तविक कालासंबंधी म्हणायचे तर...जर आपण तो इसा पूर्व ५००० वर्षे निश्चित केला तर मला नाही वाटत त्याचे खंडन करेल."

याच प्रकरणात स्वामी विवेकानंद,स्वामी दयानंद सरस्वती,योगी अरविंद यांचे ही मत आणि तर्क दिलेले आहेत.

स्वामी विवेकानंद यांनी आर्य आक्रमण सिद्धांत अनेक वेळा खोडून काढला आहे.यासंदर्भातील त्यांची मतं येथे दिलेली आहेत.देश बांधवांना सावध करताना ते म्हणतात,"जेवढे तुम्ही द्रविडी आणि आर्य तसच,ब्राह्मण आणि ब्रह्मनेत्त्तर प्रश्न,या आणि अशा साऱ्या क्षुद्र ,निरर्थक गोष्टीवरून भांडत तंडत बसाल,तेवढे तुम्ही भारताच्या भवितव्यासाठी आवश्यक असणारी शक्ती आणि सामर्थ्याचा संचय करण्यापासून वंचित राहल."

वरील विवेचन केवळ एका प्रकरणातील आहे.हे लहानसे पण फार महत्वपूर्ण माहिती असलेलं पुस्तक आहे.

पुढील प्रकरणात पुरातत्वीय पुरावे दिलेले आहेत.विविध ठिकाणचे उत्खनन आणि त्यात सापडलेल्या पुरातन वस्तू ,त्यांचे  फोटो आणि त्यांचे वर्णन यात वाचायला पाहायला मिळते.पुस्तकात या प्रकारच्या पुराव्यांचा मोठा भरणा आहे..

या पुस्तकाची भाषा अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे.विवेकानंद केंद्र द्वारा संचालित शाळांमध्ये हे अभ्यासक्रमात समाविष्ट केलं गेलेलं पुस्तक आहे.

स्वतः वाचवे.इतरांना वाचण्यासाठी प्रेरित करावे.हे पुस्तक आपण भेट देखील देऊ शकतो.

राष्ट्रीयत्वाची भावना दृढ करणारा संशोधन पर ग्रंथ!


Saturday, 29 April 2023

स्मृतिचित्रे /लेखक -लक्ष्मीबाई टिळक


               स्मृतिचित्रे.                  


लेखन: लक्ष्मीबाई टिळक
पहिली आवृत्ती:१९३४
सातवी आवृत्ती: २०१८(त्याचेच लेटेस्ट पुनर्मुद्रण)
पृष्ठ:४५८ मूल्य:४००/

मराठी सारस्वतात अमर राहणारी जी काही थोडी पुस्तके आहेत त्यात 'स्मृतिचित्रे' चा समावेश होतो. आत्मचरित्रात तर इतके पारदर्शी, भावपूर्ण व हृदयम आत्मचरित्र दुसरे नाहीच. 
प्रसिद्ध समिक्षक माधव मनोहर म्हणतात की ' हा ज्ञानेश्वरीजवळ ठेवावा असा ग्रंथ आहे.' 
स्मृतिचित्रे हे केवळ आत्मचरित्र नाही, तर तो १८६० ते १९२० या कालखंडातील सामाजिक इतिहास आहे. 
या काळातील सामाजिक बदलांचेही चित्रण यात आढळेल. 
यातील भाषा ओघवती व अकृत्रिम आहे. त्यावर इंग्रजीचा छाप नाही. 
अगदी बाळबोध मराठी किती गोड असू शकते ते या पुस्तकातून कळेल. 
हे लिखाण हृदयातून उत्स्फूर्तपणे बाहेर आलेले आहे, यामुळे त्यात ताजेपणा व जिवंतपणा आहे. लक्ष्मीबाईंचे जीवन एक प्रकारे अद्भुतरम्य व तसे जगावेगळे आहे. या रम्यतेचे, अद्भुततेचे प्रत्ययकारी चित्रण त्यांच्या सोप्या व शैलीदार भाषेने वाचकांच्या डोळ्यासमोर चित्रपटाप्रमाणे उभे राहते. 
आत्मचरित्र म्हणजे आपले दोष लपवणे व दुसऱ्याचे दाखवणे असा प्रकार असतो. तो मात्र येथे मुळीच सापडणार नाही. 
दोषांचे दर्शन नाही व कसलीच लपवाछपवी येथे नाही, किंवा कोणावर आरोप केलेले नाहीत. कोणतेही प्रचलित शिक्षण न घेता केवळ कठीण परिस्थितीशी लढा देऊन मन किती सुसंस्कृत होऊ शकते याचे चित्र या पुस्तकात आढळते. आपल्या जीवनाकडे संपूर्ण निर्विकार मनाने पाहण्याची लक्ष्मीबाईंची दृष्टी या पुस्तकात आढळून येईल. 
इतकेच नव्हे तर अनासक्त बुद्धीने कर्तव्य करीत राहण्याची निष्ठा आणि काळोखातही सोनेरी किनार लावणारी असामान्य विनोदबुद्धी त्यांच्या ठिकाणी होती. 
यातील विनोद कोणालाच बोचणारा नाही. किंबहुना स्वत:वरच केलेला आहे. 
प्रसन्न व गोड विनोद कसा असतो ते या पुस्तकावरून समजेल.

Friday, 31 March 2023

डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र /लेखिका -काशीबाई कानिटकर


सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातील या  तीन मराठी स्त्रिया ज्यांनी येथील सामाजिक स्थित्यंतर स्वतः पासून सुरू केलं..! 
आपल्या इच्छा शक्तीने,जिद्दीने समाज  आणि स्वतःच्या अप्त स्वकियांचा विरोध सहन करून त्या शिकल्या.ज्या काळात मुलींना शिक्षण हे पाप मानल गेलं.

आपल्या नवऱ्याच्या भरभक्कम साथीने त्या घरातील आणि समाजातील निंदा नालस्ती ला पुरून उरल्या.स्वतःच्या कर्तुत्वाचा ठसा कायमचा उठवला


डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र
लेखिका:काशीबाई कानिटकर
दुसरी आवृत्ती:१९१२
चौथी आवृत्ती:२०१९(त्याचेच लेटेस्ट पुनर्मुद्रण)
पेज:३२८ मूल्य:३५०/

ज्या काळात भारतीय स्त्रीला शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं, त्या काळात एक  सतरा स्त्री एकटीच परदेशी जाऊन वैद्यकीय शिक्षण घेते ही क्रांतिकारकच म्हणावी अशी घटना होती. भारतातील पहिली महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशींचं नाव आज आपण अतीव आदराने घेतो.

या उच्चविद्याविभूषित स्त्रीचं चरित्र त्यांच्या मृत्यनंतर काशीबाई कानिटकर यांनी लिहिलं. पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर म्हणून त्यांचं चरित्र लिहिलं गेलं पाहिजे आणि ते तेवढ्याच तोलाच्या स्त्रीने लिहिलं पाहिजे, असं त्यांना वाटत होतं. या संदर्भात काशीबाई लिहितात, 
“सौ. डॉ. आनंदीबाईंचे चरित्र लिहिण्यास त्यांच्या तोलाचेच मनुष्य पाहिजे होते, व ही इच्छा माझ्या एका विद्वान मैत्रिणीजवळ मी एके प्रसंगी व्यक्त केली होती; परंतु कार्यबाहुल्यामुळे तिने नन्नाच्या पाढ्यासारखेच उत्तर दिले. झाले काम तर तेथेच होईल अशी माझी अशा होती, ती निष्फळ झाल्यासारखी मला वाटली. 
कारण त्या एका मैत्रिणीशिवाय पुस्तक लिहिण्यासारखी विद्वान स्त्री माझ्या ओळखीची व योग्य अशी दुसरी आढळण्यास नाही. 
तेव्हा मला असा विचार पडला की, आता कोणाला विचारावे! शेवटी काहीच जमेना, तेव्हा हे काम वेडेवाकडे आपणच करून टाकावे, असा मी निश्चय केला.” काशीताईंना जरी हे ‘वेडेवाकडे’ वाटत असले तरी या चरित्राची दाखल तत्कालीन विविध नियतकालिकांनी घेतलेली दिसते. 
काहींनी त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं असलं तरी काहींनी प्रखर टीकाही केली. मात्र या लेखनामुळेच आनंदीबाईंचं तपशीलवार चरित्र पुढील पिढ्यांना उपलब्ध होऊ शकलं, हे या पुस्तकाचं मोठं योगदान आहे. 
अवघ्या दहा दिवसांचं मूल उपचाराअभावी दगावलं तेव्हा त्या दुःखातून सावरताना आनंदीबाईंनी डॉक्टर होण्याचा निश्चय केला आणि वयाच्या सतराव्या वर्षी एकट्याने अमेरिकेला जाऊन आपलं वैद्यकीय शिक्षण घेतलं. 
अनेक आपत्तींना तोंड देत त्यांनी शिक्षण कसं पूर्ण केलं ते काशीबाईंनी आपल्या पुस्तकात अगदी मनःपूर्वक लिहिलं आहे.
याबरोबरच आनंदीबाईंच्या पती गोपाळराव यांचं चरित्रही त्यांनी रेखाटलं आहे.

पुस्तक: देवाच्या शोधात माझा प्रवास लेखिका: गौरी अनिल इंदुलकर

देवाच्या शोधात हे पुस्तक ईश्वराच्या अस्तित्वाचे लेखिकेला आलेले पुन्हा पुन्हा प्रत्यंतर होय! श्रध्देचा आणि वाचनाचा परिणाम म्हणून लेखिकेला जे ...